वाचक लिहितात   

महिलांनी रणरागिणी बनावे

वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून सुशिक्षित आणि सुज्ञ वैष्णवीने आपले आयुष्य संपवले. स्त्रीला शक्तीस्वरूप मानले गेले आहे. घराघरातून तिचे पूजन केले जाते. आदिशक्तीने अवतार घेऊन अनेकविध असुरांचा वध केला आहे. शूर विरांगणांचा इतिहास आपल्याला लाभला आहे. मग आजच्या स्त्रिया आपल्यावरील अन्याय निमूटपणे का सहन करतात? महिलांनी स्वतःला दुबळे समजण्याची गरज नाही. स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणारी जिजाऊ ही स्त्री होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या महिला अधिकार्‍यांनी चोख कामगिरी केली, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या हातातील अदृश्य तलवार बाहेर काढण्याची आता वेळ आली आहे. स्त्रियांनी आपल्यातील आदिशक्तीची उपासना करणे आज गरजेचे बनले आहे. अत्याचार मग तो कोणाकडूनही होत असेल, तर तो सहन करता कामा नये, त्याविरोधात आवाज उठवायलाच हवा. आदिशक्तीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, मग रडायचे नाही तर लढायचे. अन्याय सहन करणे, आत्महत्या करणे हे उपाय नव्हेत.

लीना गाडगीळ, पनवेल 

कोरोनाचा धोका कमी

पाच वर्षापूर्वी जगभरात भरपूर प्राणहानी घडवलेला कोरोना सौम्यपणे..... निश्चित परतत असल्याची चिन्हे दिसून येत आहे. कोरोनाने राज्यात पुन्हा एंट्री केल्याने चिंता वाढली असली तरी घाबरण्याचे कारण नाही; मात्र नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावीच लागेल. कोरोना काळात नागरिकांना ज्या मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या, त्याचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. गर्दीत जाणे टाळावे. गर्दीत जावेच लागणार असेल, तर मास्क घालूनच जावे. सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा. आपल्या देशात जवळपास ९० टक्के लोकांचे लशीकरण पूर्ण झाले आहे. वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेणार्‍यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा धोका इतर देशांच्या मानाने कमी आहे. तरीही सतर्कता हवीच. कोरोना मुळासकट का हद्दपार होत नाही याचे उत्तर वैद्यक शास्त्राकडे देखील नाही. कोरोनाच्या उत्पत्तीबद्दलही अनभिज्ञता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते कोरोना पृथ्वीवरून हद्दपार होणे अशक्य आहे, तो नव्या रूपात येतच राहणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा मुकाबला करायचा असेल, तर अत्याधुनिक पद्धतीनेच करावा लागेल.

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

सावधगिरी बाळगणे हिताचे

डिजिटल क्रांतीच्या जमान्यात इंटरनेटवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याने वैयक्तिक क्षण इतरांना शेअर करणे ही इतकी सामान्य बाब झाली आहे की, लग्नासारखे शुभकार्य असो, शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांचे निकाल लागलेले असोत, एखाद्या ठिकाणची सहल असो इतकेच काय एखाद्या निमित्ताने एखाद्या हॉटेलमधील पार्टी असो, लगेचच त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जातात. यामधून कित्येकदा स्वतःबरोबर इतरांचीही वैयक्तिक माहिती हळू हळू इंटरनेटवर जमा होते. इंटरनेटवर अनवधानाने, अभावितपणे किंवा गाफीलपणे गोळा झालेल्या या माहितीच्या डिजिटल फूटप्रिंटचा प्रसंगी कोणीही वापर करू शकतो हे आपल्या गावीही नसते. सायबर गुन्हेगारसुद्धा डिजिटल फूटप्रिंटचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे इंटरनेट वापरताना ऑनलाइन जगात वावरताना आपण काय क्रियाकलाप करतो, त्याच्या पाऊलखुणा डिजिटल फूटप्रिंटच्या स्वरूपात उमटत असतात. त्यामुळे इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगावी.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

पवारांनी शिष्टाई करावी

केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात जागतिक पटलावर देशाची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले आहे. त्याला काही पक्षांचा विरोध होत असताना आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये कोणीही पक्षीय भूमिका आणू नयेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली असून ती निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रथमपासूनच शिवसेना उबाठा पक्ष, तृणमूलमसह काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्ष आदींनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींची निवड सरकारने परस्पर केल्याने नाराज आहेत, याचे आश्चर्य वाटले. या सर्वांनी ’राष्ट्रहित सर्वतोपरी’ म्हणत केंद्र सरकारचा विशेषाधिकार मान्य करायला हवा होता; पण विरोधासाठी विरोध कोणत्या वेळी करायचा? याचे तारतम्य राहिले नसल्याचे दिसून येते. या कामी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या या पक्षांची शिष्टाई शरद पवार यांनी करावी, त्यांची समजूत काढावी; पण पवारांचे ते ऐकतील का? हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सर्वजण मान राखतील, अशी अपेक्षा अनाठायी नाही.

डॉ. सुनील भंडगे, पुणे

 

Related Articles